सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील रोपळे (ता. पंढरपूर) येथील समस्त ग्रामस्थ भजनी मंडळाने गाथा भजनाच्या परंपरेचा ठेवा जपला आहे. यात संत तुकाराम महाराजांची गाथा समोर ठेवून त्यातील अभंगांचे क्रमशः गायन केले जाते. या वेगळ्या प्रकारच्या भजनाची जपणूक या मंडळाने केली आहे.
या भजनी मंडळाने गावातील समस्त भजनकऱ्यांना सामावून घेण्यासाठी आपल्या मंडळाला समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ असे नाव दिले आहे. या भजनी मंडळात आबालवृद्ध सदस्य असून, अध्यक्ष म्हणून जनार्दन काकडे, तर उपाध्यक्ष म्हणून धन्यकुमार शेडगे काम पाहतात.
या भजनी मंडळाची सुरुवात कै. दगडू साळवी, कै. एकनाथ कदम, कै. खंडू गायकवाड, कै. वासुदेव गुंजाळ, कै. रामचंद्र कदम, कै. महादेव शेडगे, कै. अनंता कदम व त्यांच्याच पिढीतील गोविंद कदम आदींनी केली होती. त्यांची ही परंपरा या भजनी मंडळाने चालू ठेवली आहे. कै. दगडू साळवी यांनी अत्यंत तळमळीने या भजनी मंडळाची मोट बांधल्याचा आम्हा सर्वांना अभिमान वाटत असल्याचे प्रभाकर कदम यांनी सांगितले.
यादवकालीन श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात हे भजनी मंडळ सकल संतांच्या पुण्यतिथीला आपली भजन सेवा सादर करतात. श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह या मंडळाकडून आयोजित केला जात असून, त्यात तुकाराम गाथेचे भजनरूपात पारायण केले जाते. त्यासाठी येथील किशोर काकडे यांनी संत तुकाराम गाथेच्या २५ प्रती या मंडळाला मोफत दिल्या आहेत.
‘भजनामध्ये आम्ही संत तुकाराम गाथा समोर ठेवून त्यातील अभंग क्रमशः घेतो. टाळ व मृदंगाच्या साथीने या प्रत्येक अभंगाला चाली लावल्या जात असल्यामुळे तुकाराम गाथेचे पारायण केल्याचे समाधान मिळते,’ असे प्रभाकर कदम यांनी सांगितले.